सांगलीत आढळला राज्यातील सर्वांत जुना वीरगळ लेख

सांगलीत आढळला राज्यातील सर्वांत जुना वीरगळ लेख

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे ९५० वर्षांपूर्वी युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूर योद्ध्याचे स्मारक आढळून आले आहे. 

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे ९५० वर्षांपूर्वी युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूर योद्ध्याचे स्मारक आढळून आले आहे. महाराष्टÑातील हा सर्वांत जुना वीरगळ लेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी याबाबत संशोधन केले आहे.
चालुक्यराजा दुसरा सोमेश्वर याच्या कारकिर्दीत झालेल्या एका लढाईत आगळगावातील यो्द्ध्याला वीरमरण आले. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ तयार करून त्याच्यावर लेख कोरून ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील हा पहिला लेखयुक्त वीरगळ असून, महाराष्टÑात आढळलेल्या वीरगळ लेखात तो सर्वात जुना असल्याचेही समोर आले आहे. या संशोधनाने जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासात भर पडली आहे. प्राचीन काळात एखादा वीर पुरुष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशीळा उभ्या करतात. त्याला ‘वीरगळ’ म्हणतात. ते वैविध्यपूर्ण आकारात शिल्पांकित केलेले असतात. त्यावर खालच्या टप्प्यात संबंधित वीर पुरूषाने केलेल्या लढाईचे शिल्प असते. त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरूषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प असते. अगदी वरील भागात हा वीर शिवलिंगाची पूजा करताना दाखविलेला असतो.
वीरगळ महाराष्ट्रात गावोगावी आढळतात. मात्र, ज्या योध्द्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले आहेत, त्याचे नाव मात्र क्वचितच एखाद्या वीरगळावर आढळते. महाराष्ट्रात वीरगळावरील लेख खूपच दुर्मिळ आहेत. दक्षिण महाराष्ट्रात खिद्रापूर वगळता अन्य कोणत्याही गावात आजवर असे वीरगळ लेख आढळून आलेले नाहीत. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. काटकर आणि कुमठेकर अनेक वर्षे वीरगळांवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ शोधून काढले आहेत. अभ्यास करीत असताना त्यांना कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापैकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला. हा लेखयुक्त वीरगळ सुमारे पाच फूट उंचीचा आहे. खालील भागात एक वीर ढाल आणि तलवार घेऊन एका समूहाशी लढाई करताना दाखविला आहे. वरील कलशाकृती भागावर आणि मधील टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळेकन्नड लिपीत लेख कोरला आहे.

प्राचीन इतिहासात मोठी भर
वीरगळ अभ्यासासाठी बाळासाहेब निपाणे-पाटील (मिरज), सरपंच व्यंकटराव पाटील, तुकाराम गुरव, सागर शेटे आणि नबीलाल तांबोळी यांचे सहकार्य लाभले. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक या वीरगळावर अधिक संशोधन करीत असून, लवकरच यासंदर्भातील संशोधन लेख संशोधन पत्रिकेत प्रसिध्द करण्यात येणार आहेत. या लेखाच्या संशोधनाने सांगली जिल्'ाच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे.

काय आहे लेखात...
वीरगळावरील लेखात ‘चालुक्यनृपती दुसरा सोमेश्वर ऊर्फ भुवनेकमल्ल’ याच्या कारकिर्दीत आगळगावच्या एका वीराची मोठ्या समूहाशी लढाई झाल्याचे आणि त्यात तो धारातीर्थी पडल्याचे म्हटले आहे. लेख अस्पष्ट असल्यामुळे या वीराचे नाव समजू शकत नाही. गावकुसाच्या तटावरून ही लढाई झाली. चालुक्यनृपती दुसरा सोमेश्वर ऊर्फ भुवनेकमल्ल याची कारकीर्द १०६८ ते १०७६ अशी अवघी आठ वर्षांची होती. त्याचा हा काळ अत्यंत धामधुमीचा होता. वेगवेगळ्या राजवटींबरोबर सातत्याने या काळात युद्धे झाल्याच्या नोंदी आहेत. शिवाय सोमेश्वर याचा धाकटा भाऊ विक्रमादित्य यानेही सोमेश्वराविरोधात बंडखोरी केली होती. तोही सोमेश्वर याच्या ताब्यात असणाऱ्या मुलखांवर स्वाºया करीत असे.

संकलन : सुमित रवी सरवदे

Comments

Popular posts from this blog

The secret of the “ass-curse” stones scattered across western India